Wednesday, October 2, 2024

गांधी आणि नेतृत्व

१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत देशातील सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्यचळवळीविषयी फारशी आस्था नव्हती.कारण शतकानुशतके अमुक राजा-तमुक सुलतान; फलाना बादशाह-ढीमका नवाब हाच इथला शासकवर्ग होता,आता आपल्यावर राज्य करणारा इंग्रज नवा शासक आहे उद्या तो जाऊन दुसरा येईल ही सामान्य माणसाची प्रारंभिक धारणा होती.देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे आद्य नेते देखील याच सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी किंवा त्यात हितसंबंध गुंतलेले पदाधिकारी,संस्थानिक jवैगेरे मंडळी.देशातील समाजापासून विभक्त समजल्या जाणाऱ्या आदिवासी समुदायाच्या चळवळी सोडल्या तर स्वातंत्र्य गेल्याचे दुःख झालेला वर्ग हा अभिजन आणि सत्ताधारी होता.१९ वे शतक सरता सरता देशात ब्रिटीश धार्जिणा जमीनदारांचा एक आणि मेकॉलेच्या शिक्षणाच्या गंगेने पावन झालेला दुसरा असा मध्यमवर्ग उदयाला आला.हे दोघेही वर्ग ब्रिटिश सरकारच्या मेहेरबानीला धन्यवाद देत राणीच्या उदंड आयुष्याची कामना करत होते.पण दुसरा सुशिक्षित वर्ग स्वातंत्र,समता बंधुतेच्या कल्पना मांडत होता. त्या कल्पना उदात्त असल्या तरी त्यासाठी व्यापक जनमानस तयार नव्हते.

जनमत निर्मितीच्या बाल्यावस्थेत न्या. रानडे, सुरेंद्रनाथ बनर्जी, दादाभाई नवरोजी यांनी केलेल्या प्रयत्नांना लोकमान्य, लालाजींच्या काळात बाळसे धरले आणि ते जनमत पुर्ण क्षमतेने गांधीजींवर विश्वास टाकून त्यांच्या मागे उभे राहिले.या काळात देशात एकच वेळी साम्यवादी,समाजवादी, क्रांतिकारी, हिंदुत्ववादी, मुस्लिम विभाजनवादी, सामजिक समानतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या दलित चळवळी अस्तित्वात होत्या.त्यांचे नेते लोकप्रिय होतेच शिवाय बुद्धिमान आणि सुशिक्षितही होते तसे असूनही स्वातंत्र्य चळवळीचे एकमुखी नेतृत्व महात्मा गांधींकडे राहिले आणि गांधींनंतरही भारताच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव टिकला.
यामागे गांधीच्या मोहिनी इतकीच त्यांच्या पूर्वसुरींनी केलेली वैचारिक मशागत कारणीभूत आहे.त्यामूळे महात्मा गांधीजींना २० व्या शतकातील भारताच्या सदसद्विवेकबुद्धिचे प्रतिनिधी म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

No comments:

Post a Comment